Operation Sindoor पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानच्या विविध हवाई तळांवर जोरदार कारवाई केली असून, लष्कराच्या हालचालींमधून पाकिस्तान आणखी संघर्ष वाढवण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होतं आहे. अशा पार्श्वभूमीवर, भारत सरकारने ठाम भूमिका घेत पाकिस्तानच्या प्रत्येक आगळिकेला ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला आहे.
भारतीय नौदलाचे कमोडोर रघु आर. नायर (raghu r nair) यांनी शनिवारी सांगितलं की, “पाकिस्तानने आतापर्यंत जे हल्ले केले त्यांना भारताने कठोर प्रत्युत्तर दिलं आहे आणि भविष्यातही कोणतंही युद्धजन्य पाऊल उचलल्यास, त्याला योग्य तो प्रत्युत्तर दिलं जाईल.”
हे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या ‘सीझफायर’ जाहीर केल्यानंतर आणि भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत आणि पाकिस्तानमधील डीजीएमओंमध्ये फायरिंग थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केल्यानंतर आलं आहे.
भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग (Vyomika Singh) यांनी सांगितलं की, “गेल्या काही दिवसांत पाकिस्तानला फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या अनेक लष्करी आणि हवाई तळांवर हल्ले करून भारताने त्यांचं लष्करी संतुलन ढासळवलं आहे.”
Operation Sindoor भारतीय कारवाईत पाकिस्तानच्या १० हवाई तळांना लक्ष्य
भारतीय वायुदलाने स्कर्दू, सरगोधा, जेकबाबाद, भोलारी यांसह पाकिस्तानातील किमान १० हवाई तळांवर कारवाई केली आहे. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, रडार्स, आणि हत्यार साठवणूक केंद्रांना मोठं नुकसान झालं आहे.
सीमारेषेवर पुन्हा गोळीबार आणि ड्रोन हालचाली
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर काही तास शांतता नोंदवली गेली असली, तरी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) पुन्हा गोळीबार आणि ड्रोन हालचाली नोंदवल्या गेल्या आहेत. अद्याप यावर अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
भारतीय सशस्त्र दलांची तयारी पूर्ण
“आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कोणतीही कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे,” असं कमोडोर नायर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पाकिस्तानने आपल्या लष्कराला पुढील भागात हलवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे अधिक संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय हल्ल्यात अचूक लक्ष्य – लष्करी पायाभूत सुविधांचा विनाश
पाकिस्तानकडून सशस्त्र ड्रोन, यूसीएव्ही, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आणि फायटर जेट्सद्वारे केलेल्या हल्ल्यांनंतर भारतीय लष्कराने अचूक प्रतिउत्तर दिलं. पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा, कमांड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स आणि तांत्रिक केंद्रांवर लक्ष केंद्रित करून हल्ला करण्यात आला.
भारतीय हवाई दलाचं नुकसान मर्यादित
“शत्रूच्या हल्ल्यात उदमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भुज येथील हवाई दल केंद्रांवर मर्यादित नुकसान झालं आहे,” असं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी स्पष्ट केलं.
‘नॉन-एस्कलेशन’ धोरणाला भारताची बांधिलकी – परंतु अटींसह
भारत शांततेसाठी कटिबद्ध आहे, परंतु ही शांतता पाकिस्तानकडूनही पाळली गेली पाहिजे, असं सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.