Pakistan Water Crisis जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam attack) भारताने पाकिस्तानला जोरदार झटका देत सिंधु जल करार तातडीने निलंबित केल्याची माहिती दिली आहे. भारताकडून अद्याप प्रत्यक्ष पाणी रोखण्यात आलेलं नाही, तरीही पाकिस्तानमध्ये पाण्याच्या वाटपावरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. विविध प्रांतांमध्ये यावरून गंभीर मतभेद उफाळले असून, नवीन कालवा प्रकल्पावरून मोठा वाद पेटला आहे.
सीमेपलीकडील दहशतवादामुळे भारताची कडक भूमिका
भारताचे जलसंपदा सचिव देबाश्री मुखर्जी यांनी पाकिस्तानचे समकक्ष सैयद अली मुर्तजा यांना पत्र लिहून सिंधु जल कराराच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करत तो तात्पुरता स्थगित करण्याची अधिकृत माहिती दिली.
पत्रात म्हटले आहे की, “पाकिस्तानकडून सातत्याने चालणारा सीमापार दहशतवाद, विशेषतः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ला, हा कराराच्या अटींचा स्पष्ट भंग आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने बुधवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये पाच मोठ्या पावलं उचलण्यात आली, ज्यात अटारी बॉर्डर बंद करणे, सार्क व्हिसा सवलती रद्द करणे आणि दोन्ही देशांच्या दूतावासांतील कर्मचारीसंख्या कमी करणे यांचा समावेश आहे.
पाणी न रोखताही पाकिस्तानात निर्माण झाला अंतर्गत संघर्ष
भारताकडून पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलेला नसतानाही, पाकिस्तानमध्ये पाणीवाटपावरून आपल्याच प्रांतांमध्ये तणावाचं वातावरण आहे. शहबाज शरीफ यांच्या PML-N आणि बिलावल भुट्टो यांच्या PPP यांच्यात नवीन कालवा प्रकल्पावरून चांगलाच संघर्ष सुरू झाला आहे.
गुरुवारी दोन्ही नेत्यांमध्ये इस्लामाबादमध्ये बैठक झाली आणि शहबाज शरीफ यांनी स्पष्ट सांगितलं की, “कॉमन इंटरेस्ट्स काउंसिलमध्ये (CCI) सहमती होईपर्यंत कोणताही नवीन कालवा उभारला जाणार नाही.“
“सिंधचा एकही थेंब नाही देणार” – सिंधचे मुख्यमंत्री
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी कालवा प्रकल्प स्थगित होणे म्हणजे “सिंधची मोठी विजय” असल्याचं जाहीर करत, “जेव्हा पर्यंत PPP सत्तेत आहे, सिंधमधून एक थेंबही पाणी दुसऱ्या प्रांतात जाणार नाही,” असं ठामपणे म्हटलं.
याशिवाय PPP ने सिंधमध्ये तीन दिवस साजरे करण्याची व रॅल्या काढण्याची घोषणा केली आहे.
Pakistan Water Crisis थेंब थेंब पाण्यासाठी संघर्षाची वेळ
भारताच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी थेट संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. जलसंपत्तीच्या राजकारणामुळे देशांतर्गत परिस्थिती आणखी अस्थिर झाली आहे.
एकीकडे भारत पावलं उचलत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान स्वतःच्या पाण्याच्या वाटपावर एकमत करण्यात अपयशी ठरत आहे, हे या परिस्थितीतून स्पष्ट होत आहे.
भारताच्या सिंधु जल करारावरील निर्णायक पावलांनंतर पाकिस्तानमध्ये पाण्याच्या एका थेंबावरून राजकीय स्फोट होतो आहे!