Kiran Mane वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनीही या प्रकरणावर फेसबुकवरून जोरदार संताप व्यक्त केला आहे. “हा महाराष्ट्र सध्या नीच नराधम्यांच्या मगरमिठीत अडकला आहे,” अशा थेट आणि कठोर शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर भावनिक आणि संतप्त पोस्ट लिहिली असून ती सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये वैष्णवीवर झालेल्या अमानुष छळाचा, तिच्यावर करण्यात आलेल्या मानसिक आणि शारीरिक अत्याचारांचा उल्लेख करत संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
“गुन्हेगार सत्तेत आहेत, न्याय मिळणं अशक्य!” – किरण माने यांचा संताप
फेसबुक पोस्टमध्ये किरण माने म्हणतात,
“वैष्णवी नावाच्या भगिनीवर हुंड्यासाठी अमानुष छळ झाला. तिच्यावर हात उगारला गेला, तोंडावर थुंकण्यासारखे नीच प्रकार घडले. अखेर तिने आयुष्य संपवलं. पण या प्रकरणात खरंच न्याय मिळेल का? यावर शंका आहे.”
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण, अंबरनाथ बाल अत्याचार, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आणि आता वैष्णवी हगवणे प्रकरण यांचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला.
“गुन्हेगार जेव्हा सत्तेत असतात, तेव्हा त्यांना शिक्षा होते का? तात्पुरती कारवाई, खोटं एनकाउंटर आणि शेवटी आरोपी मोकाट फिरताना दिसतात,” अशी निराशा त्यांनी व्यक्त केली.
हगवणे कुटुंबाच्या अटकेपूर्वीचे दृश्य व्हायरल
राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ६ विशेष पथकं तयार केली होती. अखेर २३ मे रोजी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. त्याआधीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये मटण खाताना दिसतो आहे. हे दृश्य पाहून नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण – काय आहे संपूर्ण घटना?
१६ मे रोजी वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने आत्महत्या केली. तिच्या लग्नात भरपूर हुंडा देण्यात आला होता, तरीही सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक छळ, मारहाण, आणि चारित्र्यावर शंका घेण्याचे प्रकार सुरूच होते. तपासात वैष्णवीच्या शरीरावर जखमांचे पुरावे आढळले आहेत. पोलिसांकडून हगवणे कुटुंबीयांविरोधात चौकशी सुरू आहे.
विशेष म्हणजे किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये वैष्णवीच्या सासऱ्याविरोधात याआधीही लैंगिक छळाचे आरोप असल्याचं अधोरेखित केलं आहे. त्यांनी लिहिलं –
“इतिहासातल्या सगळ्यात किळसवाण्या नराधम्यांना महाराष्ट्राच्या छाताडावर नंगानाच करताना बघा… पर्यायच नाही.”
राज्यभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, वैष्णवीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.