Pahalgam Terror Attack LIVE Updates पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाईची शक्यता व्यक्त होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देत कारवाईची वेळ, पद्धत आणि लक्ष्य ठरवण्याची मुभा दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसह झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आणि राजकीय पातळीवरून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
NIA कडे चौकशी; पाकिस्तानशी पाण्याचा करार निलंबित
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने या हल्ल्याची चौकशी हाती घेतली असून, अनंतनाग येथे तपास पथके पाठवण्यात आली आहेत. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सुरक्षा यंत्रणांची बैठक झाली असून, देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी पाणी वाटप करार तात्पुरता निलंबित केला असून, राजनैतिक किंवा दीर्घकालीन व्हिसा नसलेले सर्व पाकिस्तानी नागरिक 29 एप्रिलपूर्वी भारत सोडण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. राज्य सरकारांना याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सीमाभागात सलग आठव्या रात्री गोळीबार; नागरिक बंकरमध्ये आश्रय घेण्यास सज्ज
पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि कश्मीरच्या पाच जिल्ह्यांमध्ये एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अनपेक्षित गोळीबार केला. भारतीय लष्करानेही योग्य ती प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. 22 एप्रिलच्या पाहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानकडून सलग आठ रात्री शस्त्रसंधीचा भंग केला जात आहे.
सीमेवर राहणारे नागरिक आता आपले खाजगी व समाजिक बंकर साफ करून त्यात आश्रय घेण्याची तयारी करत आहेत. लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांशी संबंधित 9 मालमत्तांवर छापे टाकून त्यांचे बांधकाम पाडले आहे.
Pahalgam Terror Attack LIVE Updates मोदींची कठोर भूमिका, सर्वपक्षीय बैठकीत ठरला ठाम प्रतिसाद
पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना म्हटले की, “दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायासमोर आणल्याशिवाय थांबणार नाही. “सर्वपक्षीय बैठकीतही क्रॉस बॉर्डर दहशतवादाच्या विरोधात ठोस आणि एकत्रित प्रतिसाद द्यावा, यावर राजकीय सहमती झाली आहे.
UN सुरक्षा परिषदेत लवकरच चर्चा होण्याची शक्यता
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि ग्रीसचे राजदूत एव्हांजेलोस सेकेरिस यांनी PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “भारत-पाकिस्तानमधील वाढते तणाव लक्षात घेता, ही बाब लवकरच सुरक्षा परिषदेच्या चर्चेत येण्याची शक्यता आहे. अशा चर्चांमुळे तणाव कमी होण्याची संधी मिळू शकते.”
पाहलगाम हल्ला हा काश्मीरमध्ये नागरीकांवर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे, ज्यात बहुतेक हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानने भारताशी सहकार्य करावे – JD Vance
Fox News ला दिलेल्या मुलाखतीत JD Vance म्हणाले, “भारत-पाकिस्तानसारख्या दोन अण्वस्त्र सुसज्ज राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष उद्भवणं चिंतेची बाब आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील मित्रांशी सातत्याने संपर्कात आहोत.”