Mahavir Jayanti 2025, 10 एप्रिल 2025 आज देशभरात जैन समाजाच्या श्रद्धेचा पर्व, महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जैन धर्माचे 24 वे आणि अंतिम तीर्थंकर भगवान महावीर (Bhagwan Mahavir) यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने, त्यांच्या जीवनकार्याची आठवण आणि त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान नव्याने समजून घेण्याचा आजचा दिवस आहे.
महावीर यांचा जन्म इ.स.पू. 540 मध्ये बिहारमधील कुंडलग्राम येथे झाला होता. राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला हे त्यांचे पालक होते. राणी त्रिशला या लिच्छवी प्रमुख चेटकाच्या भगिनी होत्या. वयाच्या 30व्या वर्षी महावीर यांनी राजसत्ता आणि ऐहिक सुखांचा त्याग करून तपस्वी जीवन स्वीकारले.
Mahavir Jayanti 2025 जैन तत्त्वज्ञानाचे मूलभूत आधार
भगवान महावीर (Bhagwan Mahavir) यांनी अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचमहाव्रतांचा प्रचार केला. ते म्हणत, या तत्त्वांवर आधारित जीवनच मुक्तीचा मार्ग आहे. त्यांनी तब्बल ३० वर्षे भारतभर भ्रमण करून समाजाला ही शिकवण दिली.
जैन तत्त्वज्ञानात अनेकांतवाद आणि स्यादवाद या संकल्पनांना खूप महत्त्व आहे. यानुसार, सत्य हे अनेक अंगांनी युक्त असते आणि वस्तूचे स्वरूप तीन प्रकारांनी जाणले जाते — द्रव्य (substance), गुण (quality) आणि पर्याय (mode).
सर्व जीव (आत्मा) समान मानले जातात आणि त्यांच्यात अनंत ज्ञान, श्रद्धा, शक्ती आणि सुख या चार अनंत गुणांचा समावेश असतो. कर्मनुसार जन्म-मरणाचे चक्र चालते आणि त्यामुळे अतिसावध जीवनशैलीचा आग्रह जैन धर्मात आढळतो. अशा दृष्टीने शेती, जनावरांची वाहतूक आणि पशुप्रधान व्यवसाय टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मोक्ष प्राप्त करण्यासाठी खालील सांगितले आहेत त्रिरत्न मार्ग सांगितले आहेत: सम्यक् दर्शन (Right Faith), सम्यक् ज्ञान (Right Knowledge), सम्यक् चारित्र (Right Conduct)
याशिवाय पंचमहाव्रत हेही साधू-साध्वींसाठी अनिवार्य आहेत.
Mahavir Jayanti Quotes
“अहिंसा हीच खरी धर्माची शिकवण आहे.”
“प्रत्येक जीवावर प्रेम करा आणि कोणत्याही प्रकारे त्याला त्रास होऊ देऊ नका.”“स्वतःवर विजय मिळवणं हेच सर्वात मोठं यश आहे.”
“ज्याने आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले, त्यानेच खऱ्या अर्थाने जीवन जिंकलं.”– भगवान महावीर (Bhagwan Mahavir)
“मृत्यू माझ्यासाठी नाही. मग मी का भितो?
आजार माझ्यासाठी नाही. मग मी का हताश होऊ?
मी ना बालक आहे, ना तरुण, ना वृद्ध —
हे सर्व अवस्थांचे बदल फक्त माझ्या शरीराचे आहेत.”-जैन भिक्षू पूज्यपद (इ.स. चौथे शतक)
दिगंबर व श्वेतांबर — जैन धर्माचे दोन पंथ
इतिहासकार उपिंदर सिंग यांच्या मते, इ.स. 300 च्या सुमारास जैन संघाचे दोन पंथांत विभाजन झाले. दिगंबर (आकाशवस्त्रधारी) आणि श्वेतांबर (श्वेत वस्त्र घालणारे) हे दोन्ही पंथ आजही स्वतंत्र पद्धतीने धर्माचे पालन करतात.
चंद्रगुप्त मौर्याच्या काळात झालेल्या दुष्काळामुळे भद्रबाहू यांच्या नेतृत्वाखाली काही जैन साधू दक्षिण भारतात गेले. परत आल्यावर त्यांनी पाहिले की स्थूलभद्र यांच्या नेतृत्वाखाली उरलेल्या साधूंनी वस्त्र परिधान करायला सुरुवात केली होती. या मतभेदातूनच दोन स्वतंत्र पंथ उदयास आले.
स्त्रियांचे मोक्षप्राप्तीबाबत विचारभिन्नता
दिगंबर पंथानुसार मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्त्रीला पुरुष म्हणून पुनर्जन्म घ्यावा लागतो, तर श्वेतांबर पंथ स्त्रियाही जिनपद प्राप्त करू शकतात, असा विश्वास ठेवतो.
ग्रंथसंपदा व साहित्यपरंपरा
श्वेतांबर परंपरेनुसार त्यांचे धार्मिक ग्रंथ पाटलिपुत्र आणि नंतर वलभी (गुजरात) येथे परिषदांमध्ये संकलित झाले. या ग्रंथांमध्ये १२ अंग, उपांग, मूलसूत्र, चेडसूत्र आणि प्रकीर्ण ग्रंथ यांचा समावेश आहे.
महत्वाचे जैन ग्रंथ यामध्ये आदि पुराण (९वे शतक) ऋषभदेव यांच्या जीवनावर आधारित असून हरिवंश पुराण (८वे शतक) या ग्रंथामध्ये पांडव, कृष्ण यांच्या जैन रूपातील कथा वर्णन केल्या आहेत. तसेच परिशिष्ट पर्व (१२वे शतक, हेमचंद्राचार्य) या ग्रंथामध्ये जैन गुरूंचा इतिहास व तत्कालीन राजकीय घटनांचा उल्लेख आढळुन येतो.
महावीर जयंतीच्या निमित्ताने भगवान महावीरांच्या शिकवणीचा पुनः स्मरण करून, अहिंसा, संयम आणि सत्याचा मार्ग अनुसरण्याचा संकल्प करूया.